Skip to main content

औचित्य राज्याभिषेकाचे....


सरित्पतेचे जल मोजवेना
    मध्यांन्हीचा भास्कर पाहवेना ! 
मुठीत वैश्र्वानर बांधवेना
    तैसे शिवाजी नृप जिंकवेना !! 
 
       सभासद बखरीतील या ओळी वाचल्या की डोळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या एकेक कथा उभ्या राहतात...
     प्रतापगडाचा तो पायथा, तो लाल महाल, सुरत शहर,
आग्र्याचा तो दरबार, ती पेटाऱ्यातून सुटका आणि मग ..... मग राज्याभिषेकाचा तो सुवर्ण क्षण.
        हा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील रयतेसाठी सर्वात मोठा सण. राज्याभिषेक ही स्वराज्यातील महत्वाची घटना होती हे आपण जाणतोच. पण त्या वेळी अजून काही लहान मोठ्या गोष्टी घडल्या ज्यांचा उल्लेख एकेका वाक्यात होतो. या घटनांचे महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न आज आपण करूया...

नमस्कार ,

        आज ज्येष्ठ शु. १३ ..... ३४६ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे  श्री नृपशालिवाहन शके १५९६ , आनंदनाम संवत्सरे , ज्येष्ठ शु. १३ , शनिवार ,सूर्योदयापूर्वी तीन घटका , उषःकाली शुभ मुहूर्तावर शिवाजी महाराज क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले.

          राज्याभिषेकामुळे मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण होऊन मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे ही घटना महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातही महत्त्वपूर्ण आहे. 

        या नवीन मराठी साम्राज्याला पूर्णत्व येऊन सार्वभौमत्व सिद्ध व्हावे यासाठी महाराजांनी सुवर्ण व तांब्याची नाणी पाडली. त्यावर ' राजा शिवछत्रपती ' ही अक्षरे कोरली.

        राज्याभिषेक सोहोळ्याच्या निमित्ताने महाराजांनी नवीन शक सुरू केले - राज्याभिषेक शक. यास त्यांनी स्वतःचे नाव दिले नाही. ही घटना लोकांच्या स्मरणात राहावी हा या मागचा महाराजांचा हेतु व मोठेपणा होता.

      भारतावर मुघल व अनेक लोकांची आक्रमणे झाली. त्यांनी त्यांच्या सोबत आपली भाषा व संस्कृती इथे आणली. त्याचा प्रभाव भारतीय भाषांवर झाला. मराठी मध्ये देखील बऱ्याच फार्सी शब्दांचा वापर केला जाऊ लागला. याचा परिणाम रयतेच्या विचारसरणीवर दिसतो. म्हणूनच लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल व भाषे विषयी स्वाभिमान वाटावा म्हणून महाराजांनी  ' राज्यव्यवहार कोश '  तयार करून घेतला. या ग्रंथामध्ये फार्सी, अरबी शब्दांसाठी पर्यायी  संस्कृत शब्द दिले आहेत. 
उदाहरणार्थ , 
तख्त ( मूळ फार्सी ) त्यास पर्यायी शब्द  सिंहासन,
साहेब ( मूळ अरबी ) - स्वामी ,
हेजीब ( मूळ अरबी) - दूत,
शिकस्त ( मूळ फार्सी ) - पराभव,
किल्ला ( मूळ अरबी ) - दुर्ग ,
गनिम ( मूळ अरबी ) - वैरी , ई.

     आपल्या संस्कृतीची जोपासना तसेच त्याबद्दलची शिवाजी महाराजांची भावना ही आपल्याला त्यांच्या राज्यकारभरातून सुद्धा दिसते. पत्रव्यवहार, लेखनाचे नियम व वापरले जाणारे मायने त्यांनी नव्याने घालून दिले. गडांनाही संस्कृत नावे दिली. अष्टप्रधान मंडळातील प्रधानांच्या पदांसाठी महाराजांनी संस्कृत शब्द प्रचारात आणले. जसे,
पेशवा चे प्रधान,
सरनोबत चे सरसेनापती,
डबीर चे सुमंत,
सूरनीस चे सचिव,
मुजुमदार चे अमात्य, ई.

          आजकाल आपण हिंदु कालगणनेचा फार वापर करत नाही. सोयीसाठी इंग्रजी तारखांचा उपयोग केला जातो. त्यामुळे राज्याभिषेक या सारख्या महत्वाच्या ऐतिहासिक घटना सुद्धा इंग्रजी तारखे प्रमाणे लक्षात ठेवणे सोयीस्कर वाटते. राज्याभिषेक  समयी इंग्रज वापरत असलेल्या जुलियन कालगणनेनुसार तारीख होती - ६ जून १६७४ .
         परंतु नंतर इंग्रजांनी ग्रेेेगोरियन कालगणना स्विकारली जी आज आपणही वापरतो. पण जुुुलियन व ग्रेगोरियन कालगणनेमध्ये फरक असल्याने आता राज्यभिषक तारीख असली पाहिजे - १६ जून १६७४. 
म्हणजे बघायला गेले तर या दोन वेगळ्या पद्धतीमुळे नक्की कोणती इंग्रजी तारीख ग्राह्य धरावी हा प्रश्नच आहे.
        याबद्दल विचार केला तर प्रथम म्हणजे राज्याभिषेक या घटनेचे प्रयोजन स्वतंत्र राज्य स्थापने बरोबरच सामान्य जनतेेच्या मनात आपल्या संस्कृृतीचा अभिमान जागा करून स्वावलंबी बनवणे हा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांची ही भावना आपण लक्षात ठेेेेवली पाहिजे व त्यानुसार राज्याभिषेेक सोहोळा हा सण इतर कोणत्याही सणासारखा तिथीप्रमाणे साजरा करावा.
        कारण तेव्हाच आपण स्वतःला खरे शिवप्रेमी व खरे शिवभक्त म्हणू शकतो.....

Comments

  1. Jhakas,mustach, khup sundar,

    keep it up👍👍

    ReplyDelete
  2. फारच छान
    असाच अभ्यास सुरू ठेव

    ReplyDelete
  3. इतिहासाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास फार गरजेचा आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...