Skip to main content

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची

“साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....”

आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते.
व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज!


अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख ठिकाण व व्यापारी केंद्र. मध्ययुगात सुद्धा इथून नदीमार्गे चालणार्‍या व्यापारासाठी ते प्रसिद्ध होते. समुद्रामार्गे आलेला व्यापारी माल छोट्या बोटींवर लादून राजापुरला आणला जात असे. तिथून अणुस्कुरा घाटातून तो देशावर व कर्नाटक प्रांतात पोहचवला जाई. साहाजिकच, एतद्देशीय व्यापारांइतकेच परदेशी लोकांनाही हे ठिकाण आकर्षित करी. सन १६३८ मध्ये सर विलियम कोर्टेन यांची व्यापारी संस्था व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांनी मिळून येथे वखार उघडली. येथील इंग्रजांशी शिवाजी राजांचा पहिला संबंध सन १६५९ मध्ये आला. अफझलखान वधानंतर खानाच्या मालकीची तीन गलबते व आदिलशाही कोकणाचा मुलुख ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी आपल्या दोरोजी नावाच्या सरदाराला पाठवले. ही गलबते इंग्रजांच्या ताब्यात होती. मराठ्यांना ते कबजा देईना. त्यामुळे दोरोजींनी इंग्रजांचा एक दलाल - वेलजी व फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकार्‍याला कैद करून खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवले. पुढे दंडा राजपुरी घेण्यासाठी मदत करू अशी कबुली देऊन इंग्रजांनी महाराजांशी मैत्रीचा करार केला. परंतु महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेत हे पाहून इंग्रजांच्या ‘व्यापारी’ उद्योगांना उधाण आले. त्या नादातच, या वखारवाल्यांनी महाराजांशी केलेला मैत्रीचा करार डावलून सिद्दी जोहरला युद्धसामग्री पुरवण्याचा घाट घातला. अशा या व्यापार्‍यांना वेळीच ठिकाठिक करण्याचा मनसुबा महाराजांनी इसवी सन १६६१ च्या कोकणावरील स्वारीत पक्का केला.

एका डच अहवालानुसार, एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळासह महाराज राजापुरात दाखल झाले. नगरातील परकीय व्यापारी व धनिक यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. शिवभारतातील वर्णनानुसार, पंचक्रोशीतील पावस, कशेळी, साठवली, खारेपाटण, इ. गावांनी सुद्धा खंडणी जमा केली. इंग्रजांच्या वखारीला तर खणत्या लागल्या. सोने, रुपे, पितळ, मोती, माणके, मौल्यवान सामान, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या वस्त्रांचे ठाण, इ. बरीच संपत्ती हस्तगत झाली. यावेळी, हेन्री रेव्हिंगटन, रॅडॉल्फ टेलर, रॉबर्ट फेरंड, रिचर्ड नॅपियर, रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, एक सर्जन व विलियम मिंघम अशा एकूण आठ इंग्रजांना कैद करण्यात आले. या कैद्यांना वासोटा व पुढे सोनगडावर ठेवण्यात आले होते. ही हकिकत पुढे २८ जानेवारी १६६४ रोजी सुरतेहून लिहिलेल्या एका इंग्रज पत्रात देखील वाचायला मिळते.



अशा या इतिहासप्रसिद्ध इंग्रज वखारीचे अवशेष आजही राजापुर मध्ये अर्जुना नदीच्या किनारी अस्तित्वात आहेत. राजापूर बस स्थानकाच्या जवळून धुतपापेश्वर मंदिराकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल ओलांडून डावीकडे वळले की रस्त्यापासून जवळच हे अवशेष आहेत. ‘इंग्रज वखार’ किंवा ‘राजापूर गढी’ या नावे हे ठिकाण ओळखले जाते. सद्यस्थितीत इथे इंग्रजांनी बांधलेल्या खोल्या, जोते, विहिर व नदीकडील बाजूला गढीच्या तटाचा काही भाग व दोन बुरुज दिसतात. आम्ही गेलो त्यावेळी (जाने. २०२६) वखारीतील ‘कचेरी’च्या इमारतीच्या डागडुजीचे व नुतनीकरणाचे काम सुरू होते.
राजापूरची ही वखार म्हणजे इंग्रजांच्या भारतातील साम्राज्यवादी विस्ताराची नांदीच होय! परंतु, टोपिकरांच्या या छुप्या धोरणांना लगाम घालण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या सावध व चाणाक्ष धोरणाचेही ते द्योतक आहे. म्हणूनच अशा या महत्त्वपूर्ण वास्तूचे जतन होत आहे, ही बाब नक्कीच सुखावणारी आहे!
 
© - अदिती कुलकर्णी.


 
संदर्भ:
१. आज्ञापत्र – रामचंद्र पंत अमात्य.
२. कविंद्र परमानंदकृत श्रीशिवभारत
३. English Records on Shivaji, Vol. 1 
४. Ratnagiri District Gazetteer
५. Shivaji : His Life and Times – Gajanan Bhaskar Mehendale.

Comments

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...