Skip to main content

सर्वसमावेशक राजा

     
 


         आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस. 
इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती.
कोणती ????........
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!

          तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा   राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????

       हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.

      हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.

      शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु  जनमानसात या गोष्टींचा पगडा होता. 
     त्यामुळे काही लोकांच्या मते पहिल्या राज्याभिषेकामध्ये काही तृटी राहिल्या होत्या. काही विधी यथासांग पार पडले नव्हते. याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी त्यांची धारणा होती. 
       या साऱ्या गोष्टींचे निरसन व्हावे, कोणत्याही प्रकारचा पंथीय वाद उदभवू नये, तसेच एखाद्या पंथाच्या भावना दुखावल्या जाऊ नये या कारणास्तव महाराजांनी हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. 

       हा सोहोळा खूपच साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांना मंत्रोपदेश केला.
       या राज्याभिषेकाविषयी माहिती निश्चलपुरी गोसावी लिखित ' श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू' या संस्कृत 
ग्रंथातून मिळते. त्याच बरोबर पहिल्या राज्याभिषेकाबद्दल देखील मोलाची माहिती मिळते.

          एकूणच बघता, दोन्ही राज्याभिषेकांचे विधी जसे वेगळे होते तसेच त्यांचे महत्त्व सुद्धा वेगळे होते. पहिल्या राज्याभिषेकामुळे मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. तर दुसरा राज्याभिषेक सोहोळा महाराजांची सर्वसमावेशक विचारधारा अधोरेखित करणारा ठरला.....

Comments

  1. खूप छान माहिती.... आणि मला हे माहीत नव्हते. नवे ज्ञान दिल्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक...👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  2. महाराजांच्या कालखंडातील महत्त्वाची घटना अधोरेखित केली त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.... त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  3. अनेकांना या दोन राज्याभिषेकांबद्दल माहिती नाही.
    अशा विषयांवर केलेल्या लिखाणामुळे सामान्य वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली जाते हे स्तुत्य.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...