'छत्रपती शिवाजी महाराज' हे तीन शब्द अक्षरशः मंतरलेले आहेत. महाराजांचे अवघे आयुष्य - अवघे शिवभारत केवळ पन्नास वर्षांचे! पण त्याची व्याप्ती, त्याचे विविध पैलू आजही सुसंगत वाटणारे. महाराष्ट्राला तर या नावाने मोहिनी घातली आहे. परंतु महाराष्ट्राबाहेरही कविराज भूषण, छत्रसाल यासारख्या कित्येक लोकांना शिवचरित्राने भारावून टाकले. भूषण आपल्या एका छंदात म्हणतात,
" सिव चरित्र लखी यों भयो कबि भूषन के चित्त |
भाँति भाँति भूषनिनि सों भूषित करौ कबित्त ||"
अर्थात 'शिवरायांचे चरित्र पाहून भूषणाचे कवीमन विलोभले. भूषण म्हणतो काव्य अशाच विषयावर (शिवचरित्रावर) करावेसे वाटते जेथे विविध अलंकार शोभून दिसतात!"
एतद्देशीयांच्या बरोबरीने परकियांनाही महाराजांच्या पराक्रमाचा व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्याशिवाय राहिला नाही.
जितक्या वेळा वाचावे, ऐकावे, बोलावे तितक्या वेळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू नव्याने उलगडत जातो. एक उत्कृष्ट योद्धा, प्रजेच्या सुखासाठी कटिबद्ध असा दक्ष शासक, सावध आणि मुत्सद्दी राजनीतितज्ञ, उत्तम दुर्गस्थापत्यकार या आणि अशा कित्येक गुणांमुळे समर्थांनी त्यांना ' जाणता राजा ' म्हटले आहे.
इस्लामी सत्तांना आव्हान देत हिंदु अस्मिता आणि हिंदु संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचे जे अद्वितीय कार्य त्यांनी केले त्यासाठी दस्तुरखुद्द संभाजी राजे आपल्या वडिलांचा गौरवपूर्ण उल्लेख ' म्लेंच्छक्षयदीक्षित' असा करतात.
समर्थांनी महाराजांना लिहिलेल्या पत्रात शिवकल्याणराजा, जाणता राजा, श्रीमंतयोगी अशी कितीतरी विशेषणे त्यांच्यासाठी वापरली आहेत. पण त्यातही
"आचारशीळ, विचारशीळ | दानशीळ, धर्मशीळ
सर्वज्ञपणे सुशील | सकळां ठायी "
या ओळींमधील "सर्वज्ञपणे सुशील" हे त्यांच्या अद्वितीय चारित्र्याबद्दल खूप काही सांगून जाते. किंबहुना महाराजांचे कालातीत वेगळेपण या दोनच शब्दात उमटले आहे.
खऱ्या अर्थाने, सभासदाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, "राजा साक्षात केवळ अवतारीच..."
त्यांच्या कार्याची व्याप्ती म्हणजे सह्याद्री इतकी. पण तरीही महाराजांनी दिलेल्या ideals पैकी एखादे तत्त्व तरी पूर्णपणे आत्मसात करता यावे असे वाटतेच. यासाठी शिवचरित्राचे वाचन, श्रवण जे काही करते त्यात थोडेफार उमगलेले तुटक्या मोडक्या शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न.
बहुत काय लिहिणे?
©️ - अदिती कुलकर्णी. ✍️🏻
Comments
Post a Comment