Skip to main content

गनिमी कावा - एक अनोखे युद्धतंत्र



'..... जी बुद्धि पांच शाहीस शत्रूच्या झुलवी,
         जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी,
            जी शक्ती बलोंमत्तास पदतली तुडवी.....'
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे व बुद्धी चातुर्याचे केलेले हे वर्णन किती अचूक आहे !! 
          आदिलशाही, मुघल या बलाढ्य शाह्या महाराष्ट्राच्या भूमीवर सत्ता गाजवत असतानाच सह्याद्री लगत असलेल्या मावळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. लवकरच युद्धप्रसंग उद्भवले. परंतु या शाह्यांच्या समोर स्वराज्याचे बळ तोकडे. तरीसुद्धा स्वराज्याने मोठमोठाली सैन्य गारद केली. हे शक्य झाले कसे ??
       याचे उत्तर होते शिवाजी महाराजांची युद्धनीती..... म्हणजेच गनिमी कावा......
आजचा लेख याच विषयी.....

       गनिमी कावा हे एक युुद्धतंत्र आहे. 
            कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा संपूर्ण पराभव म्हणजेच गनिमी कावा. 
 हे तंत्र महाराजांनी स्वतः विकसित केले नाही. त्यांच्या आधी मलीक अंबर, शहाजी राजे यांनी देेेेखील ही युद्ध पद्धती वापरली होती. परंतु महराजांनी गनिमी काव्याचा आपल्या युद्धनीतीत अत्यंत प्रभावीपणे वापर करून स्वराज्य निर्माण केले. 
       मावळ प्रांत हे स्वराज्याचे केंद्रस्थान होते. येथूनच पुढे स्वराज्याचा विस्तार झाला. मावळचा हा मुलूख सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला. त्यामुळे हा सर्व प्रदेश अतिशय अवघड. युद्धप्रसंगी या दुर्गमतेचा महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला. 
       आदिलशाही किंवा मुघली फौजा अतिशय संथ गतीने हालचाली करत. फौजेत हत्ती, अवजड तोफा सोबत घेतल्या जात. तसेच सैन्यासोबत बाजारबूणगे असत. त्यामुळे या फौजांना मावळ सारख्या दुर्गम भागात हालचाल करणे अवघड होत असे. या उलट महाराजांच्या फौजेत बाजारबूणगे, हत्ती, तोफा नेण्यास बंदी होती. त्यामुळे त्या अतिशय चपळ होत्या. याचा फायदा युद्धात होत असे. 
       हळूहळू येणाऱ्या यवनी सैन्यावर मावळ्यांच्या लहान लहान तुकड्या छापे मारीत. याने यवनी फौजेत गोंधळ माजे. परिणामतः शत्रुसैन्याची फळी विस्कळीत होत. याचा फायदा घेऊन मावळे गनिमास आर्थिक दृष्ट्या अपंग करीत. शत्रूला हैराण करणे तसेच स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट ठेवणे हे दुहेरी  हेतू यातून साध्य होत. छापे घालणाऱ्या या मावळी तुकड्यांचा गनीम पाठलाग करू लागला की ते आजूबाजूच्या रानात, तर कधी जवळच्या एखाद्या किल्ल्यात पळून जात. स्वराज्याचे कमीत कमी नुकसान व्हावे हाच या मागील मुख्य उदेश्श. 
         कधी कधी मावळे मुद्दाम शत्रूस पाठलाग करायला भाग पाडी. आपला जय होत आहे असे वाटून गनीम दुप्पट वेगाने मावळ्यांच्या मागे येई. मावळे त्यांना एखाद्या अवघड ठिकाणी, कोंडीत पकडी आणि दबून बसलेले मावळे त्यांचा सहज पाडाव करायचे. 
       स्वराज्याची पहिली म्हणजे पुरंदराच्या लढाईपासून, अफझलखान, सिद्दी जौहर, उंबरखिंडीत कारतलबखान, ई. प्रत्येक युद्धात वापरलेले डाव, युक्त्या खरोखरच थक्क करतात.  जर आपण हे डावपेच लक्षपूर्वक अभ्यासले तर त्यातून महाराजांनी सह्याद्रीच्या दूर्गमतेचा केलेला वापर अगदी सहज दिसतो. त्याच बरोबर महाराजांचे युद्ध कौशल्य व व्यवस्थापन किती उत्तम होते हे देखील लक्षात येते. महाराजांच्या फौजेत शिस्त होती. गनिमी काव्यासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी हे महत्वाचे. प्रत्यक्ष लढाई संबंधी नियोजनासोबतच गनिमाचा स्वभाव, त्याची विचारसरणी, सेनापतीचे सैन्याशी संबंध आणि इतर प्रत्येक लहान मोठ्या बाबीकडे त्यांचे बारीक लक्ष असे. यामुळे महाराजांना शत्रूचा अचूक अंदाज यायचा व त्यानुसार केलेले नियोजन स्वराज्यास नेहमी उपयुक्त ठरले.

       या विधानाची सत्यता  पटवणाऱ्या अनेक घटना आहेत. त्यातीलच एक अतिशय विलक्षण घटना म्हणजे अफझलखान वध..... ही घटना महाराजांची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण होती.... म्हणूनच याविषयी पुढील लेखातून सविस्तर जाणून घेऊया......
   

Comments

  1. महाराजांच्या युद्धनीती चा महत्त्वाचा पैलू अतिशय योग्य शब्दात मांडला आहे... पुढील लेखनासाठी हार्दिक शुभकामना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...